Monday, September 3, 2012

महागायकाचा झगमगाट


महागायकाचा झगमगाट
परवा रात्री टिव्हीवर सोनी वाहिनीवर इंडियन आयडॉल ६ चा अंतिम सोहळा पार पडला. गेले कित्येक दिवस मी सुद्धा या कार्यक्रमाचा श्रोता म्हणुन पहात होतो. पाहुणे कलाकार मधुर भंडारकर आणि करिना कपुर आले होते. कार्यक्रमाचे दिग्गज परिक्षक आशा भोसले, अन्नू मलिक, सलिम मर्चन्ट व सुनिधी चौहान यांची प्रतिभा आणि प्रतिमा सर्व कलाकारांना पारखुन निरखून घेत होती. अंतिम तिनही गायक उत्तम होते. कोणी ना कोणी जिंकणार होतंच. विपुल गुप्ताचं नाव अंतिम विजेता महागायक म्हणुन जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मात्र बक्षिसांचा जणू पाऊसच पडला त्या विपुल गुप्तावर. रोख ५० लाखाचं व ३ लाखाचं बक्षिस, सुखुकी हयाते मोटरबाईक, निस्सानची चारचाकी गाडी, एका म्युजिक अलबमचा करारनामा. सारं कसं आलबेल. संयोजकांनी काही हातचं राखून न ठेवता विजेत्याला पुरस्कार बहाल केले होते. त्यालाच बक्षिसं मिळालं हा माझा आक्षेप नाहीये. तो विजेता आहे तो त्याचाच हक्क आहे, परंतू बक्षिसांची इतकी रेलचेल.....
आता त्यात नाविन्य असं काही राहिलच नाही. आज ही वाहीनी तर उद्या दुसरी...उद्या कोणी एक करोडचं बक्षिस देईल यात शंका नाही. पण ही जाहिरातबाजी नक्की कोणासाठी, तरूणांनाच्या गळ्याला भुरळ पाडणारे कार्यक्रम अशाच प्रकारे होत असतात. पण यातील विजेत्याचं नक्की भविष्य उजळतं काय? काही अपवाद असतील ही. प्रत्येक वाहिनीला टि.आर.पी नामक शिडीवर चढण्यासाठी अशा बक्षिसांची लयलूट करणं भागच असतं काय? पण त्यांच्या या अशा उधळपट्टीने समाजाचं असं काय भलं होणार आहे. मानलं की आपल्याला उत्तमोत्तम गायक मिळवून देण्याचं काम ह्या वाहिन्या करतात पण त्यामागे त्यांचा स्वार्थच असतो ना, कित्येक तरुण-तरुणी या आमिषांना भुलून मागे लागतात.
आपल्या देशाला कलेचं वरदान आहेच. या कला आत्मसात करण्यासाठी त्या कलेचं शिक्षण घेणं, त्यात प्राविण्य मिळवणं हे ध्येय असलं पाहिजे, स्पर्धा ह्या आपल्याला पारखण्यासाठी जरुर असतात पण त्या तुम्हीच एकमेव गायक हे ठरवू शकत नाहीत. कलेच्या साधनेचं महत्व तरूण पिढीने जरुर समजुन घ्यायला हवं पण त्याचं बाजारीकरण होता कामा नये........
दीपक साळुंके
०३-सप्टेंबर-२०१२

Thursday, August 30, 2012

॥ आनंद माझा ॥

॥ आनंद माझा ॥
परवा असच फ़िरताना पावसाची बारीक भुरभुर चालू होती, शांत एकाकी रस्ता आणि मी चालत चाललो होतो. एका वळणावर मला एक लोभसवाणं दृश्य पहायला मिळालं, एका झाडाखाली एक छत्री घेऊन दोन लहानगे भाऊ-बहीण आपल्या डब्यातून खाऊ खात होते. खात होते, एकमेकांना भरवत होते, मधुनच हसत होते, अधुनमधुन पावसाचं पाणी त्यांच्या अंगावर उडत होतं, पण ते जणू आपलं आयुष्य मजेने जगण्यात मश्गुल होते. किती आनंद ओसंडून वहात होता त्यांच्या चेह-यावरून, ना कसले दु:ख, ना चिंता, केवळ हसू. जवळच त्यांचे आई-बाबा आपल्या कामात गुंतलेले दिसले.
आणि मी हे दृश्य डोळ्यात सामावून निघुन गेलो पण ते एकसारखं माझ्या मनात रुंजी घालतच होतं. राहून राहून मला एक गोष्ट आठवत होती, काही वर्षापुर्वी मी आणि माझा धाकटा भाऊ, घरी आम्ही दोघेच होते. दिवसभरची कामे, जेवण आटपून आम्ही निजलो होतो. एका अर्ध्या तासानंतर अचानक वीज गेली. उकाड्याच्या दिवसांमधली ती रात्र असह्य व्हायला लागली होती. घामाने अंग भिजू लागलं होतं. खिडकी उघडली, दार उघडलं तरी वारा काही लागतच नव्ह्ता. त्यात माझ्या भावाला फ़ार उकडू लागलं होतं, तो बैचैन होऊन लोळू लागला होता. मी उठून एक पंचा घेतला आणि त्याचं घामेजलेलं अंग पुसून काढलं, तरी त्याची तगमग थांबेना मग त्या पंचाने मी त्याला वारा घालू लागलो तेव्हा कुठे तो व्यवस्थीत झोपला. मी वारा घालतच राहिलो, त्याच्या शांत निद्रिस्त चे-ह्याकडे मी पहात होतो आणि मला न जाणे कसलासा आनंद होत होता. मी त्याची झोपमोड होऊ दिली नव्हती. नकळतपणे त्या क्षणाने मला ख-या अर्थाने मोठा भाऊ बनवलं होतं.
आजही मला तो क्षण आठवला की तोच आनंद पुन्हा फुलून येतो. मला माझा भाऊ खुप आवडतो, माझं खुप प्रेम आहे त्याच्यावर, कधी बोललो नाही त्याला, पण आहे. आणि आज पहाटे माझ्या स्वप्नसरींची सुरुवात थोडी विचित्रच झाली, पण काही क्षणानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे हातात हात घालून खुप खुप भटकत होतो, दोघेच रानावनातून, डोंगर द-यातून, घाटातून, समुद्र किना-यावरुन. त्या प्रवासातला प्रत्येक क्षण आम्ही साजरा करत होतो, त्यात विशेष म्हणजे आम्ही अणवानी होते. पुढे आम्ही त्याच्या एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथेच आमचा प्रवास आणि स्वप्न थांबलं. ते थांबूच नये असं वाटत होतं.
मला क्रिकेटच्या खेळातला इरफान पठाण हा अष्टपैलू खेळाडू खुप आवडतो, याला कारण तो अष्टपैलू तर आहेच पण मला तो माझ्या भावासारखा दिसतो म्हणून. हे सर्व का लिहावसं वाटलं, ठाऊक नाही, पण या दोन क्षणांनी मला खुप आनंद दिलाय, आणि तो आनंद मी तेव्हा तेव्हा उपभोगला सुद्दा. पण हाच आनंद मला शद्बबद्ध करुन ठेवावा असा वाटू लागलं, त्यासाठीच.

दीपक....
३० ऑगस्ट २०१२